गटशेती ही सामाजिक चळवळ व्हायला हवी : डॉ. अविनाश पोळ
👤 आकाश दडस सातारा |
📅
06 August 2026 |
👁 1 Views
"गटशेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती सामाजिक चळवळ बनली पाहिजे. सामूहिक प्रयत्नांमधून गावांचे अर्थकारण बदलण्याची ताकद गटशेतीमध्ये आहे," असे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले.
पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत सहभागी शेतकरी गटांसाठी पिंपरी येथे यशवंत शेतकरी गटाच्या वतीने आयोजित संवाद व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
डॉ. पोळ म्हणाले की, माण तालुक्यात गटशेतीची चळवळ वेगाने बहरत असून आधुनिक तंत्रज्ञान, सामूहिक नियोजन आणि खर्चात बचत यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. त्यामुळे ज्या गावांनी अद्याप या उपक्रमात सहभाग घेतलेला नाही, त्यांनीही गटशेतीच्या माध्यमातून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषी अधिकारी वैभव लिंगे आणि विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी आधुनिक शेती, जलसंधारण, पिक व्यवस्थापन तसेच फार्मर कप स्पर्धेची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चंद्रकांत शिलवंत यांनी केले, तर नेताजी राजगे यांनी आभार मानले.
मेळाव्यात सहभागी सर्व शेतकरी गटांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच गटशेतीच्या माध्यमातून उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ. अविनाश पोळ, सुखदेव भोसले, कृषी अधिकारी वैभव लिंगे, जयदीप बनसोडे, चंद्रकांत भोसले, उदय शिंदे, मेंटर सुजित बनसोडे, आत्माचे राहुल कर्चे, उमेद अभियानाचे शंकर नरबट, सुनील काळे, पानी फॉउंडेशनचे जितेंद्र फडतरे, शिवानी सातपुते माजी सरपंच चंद्रकांत शिलवंत यांच्यासह माण तालुक्यातील विविध शेतकरी गटांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.