मुंबई–सावंतवाडी नव्या रेल्वे सेवेमुळे वैभववाडीकरांना मोठा दिलासा
👤 तुषार शिंगाडे |
📅
12 August 2026 |
👁 9 Views
कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी अशी नवीन रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. या रेल्वेला वैभववाडी येथे थांबा देण्यात आल्याने तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण रेल्वे सेवेसाठी वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी खासदार नारायणराव राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
मुंबईसह कोकणातील विविध भागांत प्रवास करणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील नागरिकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नवीन रेल्वेला वैभववाडी येथे थांबा मिळाल्याने प्रवाशांच्या वेळेची तसेच प्रवासातील गैरसोयीची बचत होणार असून, तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, वैभववाडी येथे जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी सभापती सिद्धेश रावराणे यांनी केली आहे. या दोन्ही गाड्यांना थांबा मिळाल्यास मुंबई, कोकण तसेच राज्यातील इतर भागांत जाणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
श्रेयवादापेक्षा प्रत्यक्ष पाठपुरावा महत्त्वाचा
दरम्यान, या रेल्वे सुविधांबाबत सोशल मीडियावर उबाठा गटाकडून श्रेय घेण्याची धडपड सुरू असल्याचा आरोप सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करून सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा करून श्रेय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैभववाडी तालुक्यातील प्रवाशांच्या वतीने नवीन रेल्वे सेवा आणि वैभववाडी स्थानकाला मिळालेल्या थांब्याबद्दल खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.