गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन
👤 तुषार शिंगाडे |
📅
13 August 2026 |
👁 8 Views
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील प्रतिष्ठित स्क्रॅप व्यापारी तथा गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. शिवाजी राजाराम इंगळे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. ते गेल्या १४ वर्षांपासून आजारपणाने त्रस्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने गोंधळी समाजासह कणकवली परिसरात शोककळा पसरली आहे.
कै. शिवाजी इंगळे हे गोंधळी समाजातील सुरुवातीच्या काळातील उच्चशिक्षित व्यक्ती म्हणून परिचित होते. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, गरजू व गोरगरीब व्यक्तींना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अडचणीची वेळ आली, तर मदतीसाठी ते सदैव तत्पर असत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजबांधव, मित्रपरिवार, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या जाण्याने समाजाने एक मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
कै. शिवाजी इंगळे यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.