एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा
👤 संतोष एडके तासगाव |
📅
13 August 2026 |
👁 17 Views
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब (अराजपत्रित) २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची भरती प्रक्रिया विलंबाने सुरू असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्य परीक्षा होऊन जवळपास तीन महिने होत आले असून, अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊनही जवळपास दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप सर्वसाधारण गुणवत्ता यादी (जीएमएल) जाहीर झालेली नाही. त्यामुळे पुढील टप्प्याची तयारी करायची कशी, असा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.
एमपीएससीने २९ जुलै २०२५ रोजी गट-ब २०२५ पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली पूर्व परीक्षा दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. २३ मार्च २०२६ रोजी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी मुख्य परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि १७ मे रोजी मुख्य परीक्षा पार पडली.
मुख्य परीक्षेनंतर २७ मे रोजी प्रथम उत्तरतालिका, तर १७ जून रोजी अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. अंतिम उत्तरतालिकेनंतर निकालाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन जीएमएल जाहीर होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, १७ जूननंतर जवळपास दोन महिने उलटूनही गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याने उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे.
पुढील टप्प्याची तयारी कशी करायची?
पीएसआय पदासाठी गुणवत्ता यादीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढे शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागते. मैदानी चाचणीसाठी सराव, वेळ आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे जीएमएल लवकर जाहीर झाल्यास पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणीची तयारी व्यवस्थित करता येईल. मात्र, आपले नाव गुणवत्ता यादीत आहे की नाही, हेच स्पष्ट नसल्याने अनेक उमेदवार मानसिक संभ्रमात आहेत.
“मुख्य परीक्षा होऊन जवळपास तीन महिने होत आले आहेत. गुणवत्ता यादी जाहीर होत नसल्याने पुढील टप्प्यासाठी नेमकी कशी तयारी करायची, हा प्रश्न आहे. जीएमएल लवकर जाहीर झाल्यास पात्र विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीसाठी योग्य नियोजन करता येईल.”