मौजे साखराळे हद्दीतील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता ७ हजार टन प्रतिदिनावरून १५ हजार टन प्रतिदिन करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सहवीजनिर्मिती क्षमता २८ मेगावॅटवरून ६८ मेगावॅटपर्यंत वाढविण्याचा अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मात्र, या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक पूर्वसंमती घेणे अपेक्षित असताना, ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रस्तावित विस्तारीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम सुमारे ८० ते ९० टक्के पूर्ण झाले असतानाही नागरिकांसमोर चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल सादर करून फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची पूर्वसंमती न घेता विस्तारीकरण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हे संपूर्ण प्रकरण ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विस्तारीकरणाच्या अहवालास विरोध दर्शवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हरकती नोंदवल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अतिरिक्त उपप्रादेशिक अधिकारी, सांगली येथील श्री. प्रमोद रा. माने यांच्याकडे ग्रामस्थांनी हरकतीचे निवेदन सादर केले.विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का, प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक संमती घेण्यात आली होती का आणि प्रत्यक्ष कामाची स्थिती काय आहे, याची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.