निसर्गाची अवकृपा, दुष्काळ आणि बाजारभावातील चढ-उतार यांसारख्या आव्हानांचा सामना करत उभ्या केलेल्या पिकावर जेव्हा स्वतःच्याच माणसांची वाईट नजर पडते, तेव्हा कष्टाची केवळ राखरांगोळी होते. असाच एक चीड आणणारा आणि सुन्न करणारा प्रकार दिघंची येथे उघडकीस आला आहे. येथील युवा शेतकरी सचिन मेनकुदळे यांच्या दोन एकरांतील ढब्बू मिरचीच्या पिकावर अज्ञात माथेफिरूने रात्रीच्या वेळी तणनाशकाची फवारणी करून सुमारे १० लाख रुपयांचे अतोनात नुकसान केले आहे.
तोड्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला
सचिन मेनकुदळे यांनी पुजारवाडी हद्दीतील आपल्या शेतात यंदा पहिल्यांदाच मोठ्या उमेदीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन एकर क्षेत्रावर ढब्बू मिरचीची लागवड केली होती. दिवस-रात्र एक करून, मोठा खर्च आणि मेहनत घेऊन त्यांनी हे पीक फुलवले होते. येत्या दोन-तीन दिवसांतच मिरचीचा पहिला तोडा सुरू होणार होता. त्यामुळे कष्टाचे फळ मिळण्याच्या आशेने शेतकरी आनंदात होता. मात्र, अज्ञाताने घातलेल्या या धाडीमुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
सकाळी शेतात जाताच कष्टाची राखरांगोळी
नेहमीप्रमाणे सचिन मेनकुदळे हे सकाळी आपल्या शेतात गेले असता, त्यांना सुमारे एक एकर क्षेत्रातील ढब्बू मिरचीची झाडे करपलेली आणि कोमेजलेली दिसली. संपूर्ण पिकावर विषारी तणनाशकाचा मारा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या काही तासांत डोळ्यांदेखत पीक जळून खाक झाल्याचे पाहून युवा शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेत जवळपास १० लाख रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे.
युवा शेतकऱ्यांच्या मनोबलावर मोठा घाला
आजच्या काळात तरुणांनी शेतीकडे वळावे, पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवनवीन प्रयोग करावेत, असा सल्ला दिला जातो. सचिन यांच्यासारखा युवा शेतकरी हाच आदर्श समोर ठेवून प्रयोगशील शेती करत होता. मात्र, वैयक्तिक राग किंवा मत्सर यातून उभ्या पिकाचा असा बळी घेतला जात असेल, तर नव्याने शेतीत उतरणाऱ्या युवा पिढीचे मनोबल खचणार नाही का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
परिसरात तीव्र संताप; आटपाडी पोलिसांत तक्रार
एखाद्याशी वाद किंवा मतभेद असतील तर न्यायासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. परंतु, असा राग उभ्या पिकावर काढणे ही विकृती असून, यामुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "निसर्गाशी आणि बाजाराशी लढणारा शेतकरी आता माणसांच्या कपटकारस्थानांशी कसा लढणार?" असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
याप्रकरणी सचिन मेनकुदळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, रात्रीच्या वेळी तणनाशक फवारणाऱ्या त्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी दिघंची व परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.
"शेतकरी निसर्गाशी लढतोय, बाजारभावाशी झुंजतोय; आता त्याला माणसांशीही लढण्याची वेळ येऊ नये!"