धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नावरून २९ जुलै रोजी बारामती येथे सरकारविरोधात ‘विश्वासघात दिन’ पाळण्यात आला. समाजबांधवांनी कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाच्या निषेधाची भावना व्यक्त करत आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
२९ जुलै २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असताना तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला १२ वर्षे पूर्ण होत आली असून तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळूनही आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याने समाजात तीव्र नाराजी आणि विश्वासघाताची भावना निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी आंदोलकांनी शासनाने गेल्या १२ वर्षांत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेल्या समित्या, टीआयएस (TISS) संस्थेची नियुक्ती, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची कार्यवाही आणि त्यातून झालेली प्रगती याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली. तसेच धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी आणि पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय समिती स्थापन करून प्रक्रिया सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.
क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे आणि धनगर विवेक जागृती अभियानाचे विक्रम ढोणे यांनी यावेळी भूमिका मांडताना, "गेल्या १२ वर्षांत धनगर समाजाची केवळ फसवणूक झाली असून समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला जात असेल, तर सरकारने समाजाला गृहीत धरू नये. अन्यथा सरकारविरोधातील निषेध अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा दिला.
धनगर समाजाचे पारंपरिक प्रतीक असलेल्या कपाळावरील भंडाऱ्याऐवजी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधातील संताप व्यक्त केला.
उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्या वतीने नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात विक्रम ढोणे, कल्याणी वाघमोडे, ताई मदने, तानाजी कटरे, सुजित वाघमोडे, विक्रांत काळे, गणपत देवकाते, सुरेश खताळ, जयाप्पा खरात, अंकुश मुढे, बाबू मदने, नवनाथ सूळ, विनय शेळके, संतोष तोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे बांधव आणि भगिनी उपस्थित होते.