आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी
👤 संतोष एडके तासगाव |
📅
24 August 2026 |
👁 53 Views
आरवडे (ता. तासगाव):
ग्रामपंचायत आरवडे यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत गावाचे ऐतिहासिक नाव "आरवडे" बदलून "गोपाळपूर" करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, हा निर्णय अत्यंत घाईगडबडीत, बहुसंख्य ग्रामस्थांना विश्वासात न घेता व लोकशाही प्रक्रियेचा अवलंब न करता घेतला असल्याचा आरोप करत 'आरवडे गाव नामांतर विरोधी संघर्ष कृती समिती' व ग्रामस्थांनी या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नामांतराचा ठराव त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन गटविकास अधिकारी (पंचायत समिती तासगाव), तहसीलदार (तासगाव), प्रांत अधिकारी (मिरज), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद सांगली) आणि जिल्हाधिकारी (सांगली) यांना सादर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात मांडलेले प्रमुख मुद्दे:
ऐतिहासिक वारसा व ओळख: 'आरवडे' हे नाव सहस्रवर्षांचा इतिहास असलेले व जगात एकमेव नाव आहे. तासगाव पूर्व भागातील आरवडे, बलगवडे, लोढे, सावर्डे, मांजर्डे, बस्तवडे या सहा गावांच्या मालिकेत आरवडे या नाव व संस्कृतीचे विशेष स्थान आहे.
ग्रामदैवताचे प्राचीन मंदिर: गावाच्या मध्यभागी हजार वर्षांहून अधिक प्राचीन श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर असून या धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख गावाच्या मूळ नावाशी जोडलेली आहे.
ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष: गावात अकरावी व पुढील शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसेस नाहीत, तसेच शेतीसाठी पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांचा तुटवडा आहे. अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता नामांतराच्या विषयाकडे लक्ष भरकटवले गेले.
प्रशासकीय व आर्थिक भुर्दंड: नाव बदलल्यास ७/१२ उतारे, आधार कार्ड, मतदार यादी, मालमत्ता दस्तऐवज, शाळा-कॉलेजचे दाखले व बँकिंग कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतील, ज्यामुळे ग्रामस्थांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागेल.
पर्यायी तोडगा: इस्कॉन मंदिर परिसरापुरता 'गोपाळपूर' असा स्थानिक नामउल्लेख करण्यास ग्रामस्थांचा आक्षेप नाही, मात्र त्यासाठी संपूर्ण गावाचे मूळ नाव बदलणे अयोग्य आहे.
उपोषणाचा इशारा:
ग्रामपंचायतीने २१.०८.२०२६ रोजी घेतलेला नामांतराचा ठराव त्वरित रद्द करून, गावाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवर चर्चा करण्यासाठी सर्वसमावेशक ग्रामसभा बोलावावी, अशी मागणी समितीने केली आहे. प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.