राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३९ वा स्मृतिदिन उत्साहात संपन्न
जत, दि. ८ (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे आणि समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या विचारातून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यांत शिक्षणाची संस्कार केंद्रे उभी केली. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्रात मोठे शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन घडून आले. शिक्षणामुळे गोरगरिबांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनात डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. चंद्रसेन मानेपाटील यांनी केले.
राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भीमाशंकर डाहळके होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले, पत्रकार मनोहर कोकळे, विवेकानंद इन्स्टिट्यूटचे बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भीमाशंकर डाहळके यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारीत होणे अधिक गरजेचे आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद आणि श्रीमंत रामराव महाराज डफळे यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना प्रा. चंद्रसेन मानेपाटील म्हणाले की, शिक्षणामुळेच मानवी जीवनात परिवर्तन घडते. जीवनात परिवर्तन घडवून यश संपादन करायचे असेल तर थोरामोठ्यांच्या चरित्रांचे वाचन केले पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख, कर्मवीर जगदाळे मामा, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. पतंगराव कदम आणि दलित मित्र कदम गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्र देशात शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी राहिला आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रसारामुळे सामाजिक क्रांतीला चालना मिळाली असून त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबरच डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. संत गाडगे महाराजांचे शिष्य शिंदे महाराज यांनी १९६८ साली डॉ. बापूजी साळुंखे यांना ‘शिक्षणमहर्षी’ ही पदवी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भीमाशंकर डाहळके यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी केवळ सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारीत होणे अधिक गरजेचे आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले, तर प्रा. विशाल गोडबोले यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.