माजी ग्राम विकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टा नगरीला भेट दिली.यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब डांगे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. अण्णासाहेबांनी लिहिलेले ‘आम्रवृक्ष’ हे आत्मचरित्र म्हणजे आरशाप्रमाणे त्यांच्या जीवनाची, घडलेल्या प्रसंगांची जशी आहे तशी प्रतिमा दाखवणारे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी चिमणभाऊ डांगे विश्वनाथ बापू माझ्याकडे आले होते, त्यानंतर आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय द्याव्यात, याचा मी विचार करत होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देऊ शकलो, तर तीच आप्पांसाठी लाखमोलाची शुभेच्छा ठरणार आहे.”
अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक आणि समाजाच्या विविध घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.
अण्णासाहेब डांगे यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा सोहळा आष्टा नगरीसाठी विशेष ठरला. ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राच्या माध्यमातून अण्णासाहेबांच्या प्रदीर्घ जीवनप्रवासाचे विविध पैलू वाचकांसमोर येणार आहेत.