१८ नवोदित विद्यार्थ्यांचे फेटे बांधून स्वागत; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वितरण
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच दिवशी वासुंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या १८ नवोदित विद्यार्थ्यांचे रंगीबेरंगी फेटे बांधून, गुलाबपुष्प देऊन आणि टाळ्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप करून त्यांच्या नवीन शैक्षणिक प्रवासासाठी प्रोत्साहन देण्यात आले. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे आणि शाळांचे बळकटीकरण करणे या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार मा. अतुल पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “मोठी स्वप्ने पाहा, ध्येय निश्चित करा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा,” असे आवाहन केले.
गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करताना, “शिक्षण हेच मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवू शकते,” असे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला.
गटशिक्षणाधिकारी श्री. प्रदीप चव्हाण यांनी शासनाच्या प्रवेशोत्सव उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.
पर्यवेक्षित उपशिक्षणाधिकारी श्री. अभिमन्यू खराडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
पंचायत समितीच्या सभापती सौ. अरुणा पाटील यांनीही शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
वासुंबेचे लोकनियुक्त सरपंच श्री. जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, “विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत. गावात शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सदैव कटिबद्ध आहे,” असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सुनिता एडके यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. संगीता पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा राज्य शासनाचा संदेश वाचून दाखविला. यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. कस्तुरी पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. बालिका माने, श्री. महेशदादा पाटील, माजी सभापती सौ. माया एडके, ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब एडके, श्री. संतोष एडके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुशांत पाटील, श्री. उल्लास भोसले, श्री. सुरेश चव्हाण, श्री. काशिनाथ भोसले यांच्यासह शाळेचे शिक्षक-शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल आकर्षण निर्माण झाले असून, वासुंबे परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक चैतन्यमय झाले आहे.