आटपाडीतील हॉटेल व्यवसायात स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?
👤 आटपाडी प्रतिनिधी |
📅
17 June 2026 |
👁 218 Views
आटपाडी, प्रतिनिधी : आटपाडी शहरासह तालुक्यातील अनेक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, वडापाव केंद्रे व फास्टफूड स्टॉलमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छता, अन्न साठवणूक, खाद्यपदार्थ हाताळणी आणि पॅकिंगसंदर्भातील नियम धाब्यावर बसविले जात असून संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थ वृत्तपत्रात गुंडाळून देण्यास बंदी घातलेली असतानाही आजही अनेक ठिकाणी वडापाव, भजी, समोसे आणि इतर खाद्यपदार्थ थेट वर्तमानपत्रात गुंडाळून ग्राहकांना दिले जात आहेत. FSSAI ने वारंवार इशारा दिला आहे की वर्तमानपत्रातील शाईतील रसायने, जड धातू तसेच अस्वच्छतेमुळे अन्न दूषित होऊ शकते व आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक खाद्य व्यावसायिकांकडे स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. काही ठिकाणी अस्वच्छ पाणी, उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ, अस्वच्छ भांडी तसेच कर्मचाऱ्यांकडून हातमोजे किंवा आवश्यक सुरक्षासाहित्याचा वापर केला जात नसल्याचे दिसून येते.
अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अशा कारवाया अपुऱ्या असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परिणामी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून संबंधित विभागाने तातडीने विशेष तपासणी मोहीम हाती घेऊन नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी ओळखून अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.