उद्या संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, या सणाच्या मुळाशी असलेला हजारो वर्षांचा इतिहास अनेकांना माहिती नाही.या सणाची सुरुवात नेमकी कधी झाली याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी, याचा पहिला उल्लेख महाभारत काळात आढळतो. भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली असता द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या बोटाला बांधला होता. त्या एका धाग्याचे ऋण म्हणून श्रीकृष्णाने वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीचे रक्षण केले. तेव्हापासून हा बहीण-भावाच्या अतूट नात्याचा आणि रक्षणाचा सण बनला.ऐतिहासिक दृष्ट्या या सणाचा सर्वात मोठा पुरावा इ.स. 1535 मधला आहे. चित्तोडची राणी कर्णावती हिच्यावर गुजरातचा सुलतान बहादूरशहा याने हल्ला केला असता, राणीने दिल्लीचा मुघल सम्राट हुमायूं याला राखी पाठवून मदतीची याचना केली होती. हुमायूंनेही बहिण मानून तिच्या रक्षणासाठी धाव घेतली.तर 1905 साली बंगालच्या फाळणीच्या वेळी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या सणाचा वापर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केला. त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना एकमेकांना राखी बांधून एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केले होते.
आज हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न राहता, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना, समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना राखी बांधण्यापर्यंत विस्तारला आहे. धागा एकच, पण भावना रक्षणाची.