छात्रों की गूंज’ला सिंधुदुर्गातून बुलंद पाठिंबा; कणकवलीत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची माहिती
👤 तुषार शिंगाडे |
📅
21 August 2026 |
👁 9 Views
देवगड (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज देण्यासाठी ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भक्कम पाठिंबा देण्यासाठी कणकवली येथेही मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिली.
परीक्षा व्यवस्था, पेपरफुटीचे आरोप, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, शैक्षणिक संधीतील असमानता, वाढता आर्थिक ताण तसेच विद्यार्थिनींची सुरक्षा यांसारख्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा नसून देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवणे आवश्यक असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
कणकवलीतही ‘छात्रों की गूंज’चा आवाज घुमणार
पुण्यातील कार्यक्रमाला समर्थन देण्यासाठी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस आणि कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
“पुण्यात राहुल गांधी विद्यार्थ्यांचा आवाज ऐकणार आणि कणकवलीतून सिंधुदुर्ग जिल्हा त्या आवाजाला बुलंद पाठिंबा देणार,” अशी भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील तरुण-तरुणी शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, शिक्षण सर्वांसाठी समान व गुणवत्तापूर्ण असावे, परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी आणि तरुणांना त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळावा, या मागण्यांसाठी ‘छात्रों की गूंज’ला पाठिंबा देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस व कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.