तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर
👤 संतोष एडके तासगाव |
📅
03 August 2026 |
👁 86 Views
तासगाव येथे श्रमिक मुक्तीदल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल आणि मेंढपाळ आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजचळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात नूतन परिट यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणाने केली. यावेळी प्रा. वासुदेव गुरव, अर्जुन थोरात, भरत थोरात, सुधीर नलवडे, अमर खोत आणि ॲड. कृष्णा पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सामाजिक व पाणी चळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. भारत पाटणकर यांना नुकताच कोल्हापूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा "समाजभूषण" पुरस्कार तसेच पुरंदर येथे पाणी चळवळीतील योगदानाबद्दल पाणी पंचायतीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर तासगावकरांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पाटणकर यांनी दुष्काळी भागात समन्यायी पाणी वाटपासाठी उभारलेल्या संघर्षाचा आढावा घेतला. या चळवळीमुळे अनेक दुष्काळग्रस्त भागात फळबागा विकसित झाल्या, ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाला आणि रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर कमी झाले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित करत, "ज्या प्रमाणात इतर दुष्काळी तालुक्यांनी समन्यायी पाणी वाटपाच्या चळवळीत सहभाग घेतला, त्या प्रमाणात तासगाव तालुक्याने आपला वाटा उचलला आहे का? तासगावातील शेतकऱ्यांना समन्यायी पाणी वाटप कधी मिळणार?" असा सवाल केला.
"माणूस केवळ पाणी पिऊन जगू शकत नाही. शेतीसाठी आवश्यक पाणी मिळाल्यासच अन्नधान्य व इतर पिकांचे उत्पादन होईल. त्यामुळे तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला, तर तोच माझा खरा सत्कार ठरेल," असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास ॲड. कृष्णा पाटील यांचे कुटुंबीय, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.