मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या कामादरम्यान आदिवासी शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदाराविरुद्ध सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत डहाणू तालुक्यातील मौजे गणेशबाग, गंजाड येथील शेतकरी राजेश यशवंत वळवी यांनी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी, डहाणू यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवेचे काम सुरू असताना संबंधित कामातून शेतजमिनीत दगड, माती, मुरूम तसेच इतर गौण खनिज टाकण्यात आल्याने शेतीयोग्य जमीन खराब झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी महसूल विभागामार्फत पंचनामा व अहवालही तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच संबंधित कंपनीला नोटीस बजावून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
या प्रकरणाची भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास लक्ष्मण वांगड यांनी गंभीर दखल घेत आदिवासी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच RKC कंपनीचे संबंधित कंत्राटदार योगेंद्रसिंग वाघेला यांच्या भूमिकेची सक्षम प्राधिकरणामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशीत कायद्याचे उल्लंघन अथवा शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पीडित शेतकरी राजेश यशवंत वळवी यांना तातडीने न्याय व योग्य नुकसानभरपाई न मिळाल्यास भारतीय अस्मिता पार्टीच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विलास वांगड यांनी दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी तसेच पीडित आदिवासी शेतकऱ्यास तात्काळ न्याय व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय अस्मिता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.