कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्या प्रकरणात नवे पैलू समोर येत आहेत. सुरुवातीला अनैतिक संबंध आणि लग्नासाठीचा दबाव हे हत्येमागील कारण असल्याची चर्चा होती. मात्र, आता आर्थिक व्यवहारातील वादातून ही घटना घडल्याची माहिती स्थानिक स्तरावर पुढे येत असून, पोलीस या सर्व बाबींचा तपास करत आहेत.
माहितीनुसार, सुरेखा न्यारे यांनी आरोपी प्रकाश पाटील याला वाहन खरेदीसाठी आर्थिक मदत केली होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दागिने सोडवण्यासाठी लागणाऱ्या रकमेची मागणी त्यांनी वारंवार केल्याने दोघांमध्ये आर्थिक वाद निर्माण झाला होता. या वादातूनच आरोपीने हत्येचा कट रचल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
पोलीस तपासानुसार, रविवारी सकाळी आरोपीने सुरेखा न्यारे यांना पंढरपूरला जाण्याचे सांगून कारमध्ये बसवले. मात्र, त्यांना गावाबाहेरील लिंडोरी परिसरातील जनावरांच्या शेडमध्ये नेऊन गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
हत्येनंतर मृतदेह पोत्यात भरून ठाणे जिल्ह्यातील कशेळी परिसरात समुद्रात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी आरोपीने आपल्या संदेश नावाच्या भाच्याशी संपर्क साधला. संशय आल्याने भाच्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर नारपोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न उधळून लावला.
या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सुरेखा न्यारे यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. आता त्यांच्या निधनामुळे एकुलता एक मुलगा शुभम याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले असून, या घटनेमुळे शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.