मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ च्या श्रीरामपूर केंद्र व तालुकास्तरीय पारितोषिक वितरण समारंभात श्रीरामपूर तालुक्यातील तब्बल २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन उत्साहात गौरव करण्यात आला. रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी श्रीरामपूर येथील डावखर लॉन्स, गोंधवणी रोड येथे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ तथा निवृत्त गटशिक्षण अधिकारी मा. संजीवन दिवे साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवीन मराठी शाळेचे चेअरमन मा. ऋषिकेश जोशी, भारत अंडर-१८ मुलांच्या व्हॉलीबॉल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मा. गौरव डेंगळे, चार्टर्ड अकाउंटंट मा. संजय पगारे, नवीन मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मा. भारत शेंगाळ, एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पैठणकर तसेच श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक मा. चेतन डोंगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंथन परीक्षा केंद्र समन्वयक श्री. श्रीकांत सोनवणे व केंद्र समन्वयिका सौ. प्रतिभा सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मंथन सामान्य ज्ञान परीक्षेच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश पिंगळे यांनी केले.मंथन सामान्य ज्ञान परीक्षा गेल्या १५ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सातत्याने आयोजित केली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि भविष्यातील विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांचा मजबूत पाया तयार करणे हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची ओळख शालेय वयातच व्हावी आणि त्यांच्यामध्ये अभ्यासाची सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने मंथन वेल्फेअर फाउंडेशनकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
मंथन सामान्य ज्ञान परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात पाच भाषांमध्ये घेतली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होत असतात. इयत्ता चौथी ते सातवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच इयत्ता पाचवी ते आठवीच्या नवोदय प्रवेश परीक्षेची तसेच इयत्ता आठवीच्या NMMS परीक्षेची पूर्वतयारी म्हणूनही या परीक्षेकडे पाहिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशक्ती आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या पद्धतीचा अनुभव लहान वयातच मिळतो.
श्रीरामपूर तालुक्यातील विविध शाळांमधून या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभात विशेष गौरव करण्यात आला. एकूण २८० विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी २०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या गौरवामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाली.
मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ देण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रातील या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आगामी काळात गोवा, कर्नाटक तसेच इतर हिंदी भाषिक राज्यांमध्येही मंथन सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्याचा मानस फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंथन परीक्षा केंद्र समन्वयक श्री. श्रीकांत सोनवणे, केंद्र समन्वयिका सौ. प्रतिभा सोनवणे यांच्यासह श्री. वसीम शेख सर, श्री. अभिजीत खरात सर आणि इतर सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या नियोजनातून आणि परिश्रमातून श्रीरामपूर केंद्राचा हा पारितोषिक वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती, सामान्य ज्ञानाची आवड, आत्मविश्वास आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मंथन सामान्य ज्ञान परीक्षा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आलेला गौरव हा त्यांच्या मेहनतीचा सन्मान असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.