गरजूंच्या डोक्यावर आधाराचा तंबू; देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जतमध्ये सेवाभावी उपक्रम
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जत शहरातील यल्लमा देवी मंदिर परिसरात भटकंती करून उपजीविका करणाऱ्या पिंगळ, जोशी आणि वैदू समाजातील पालावर वास्तव्यास असलेल्या गरजू कुटुंबांना तंबूंचे वाटप करण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते हा सेवाभावी उपक्रम पार पडला.पावसाळ्याच्या दिवसांत सुरक्षित निवाऱ्याची गरज लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. गरजवंतांच्या डोक्यावर सुरक्षित आसरा उपलब्ध करून देणे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे आणि वंचित समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तंबू उभारल्यानंतर घडलेला एक हृदयस्पर्शी प्रसंग उपस्थितांच्या मनाला भावला. लाभार्थी कुटुंबातील एका महिलेने प्रेमाने "साहेब, चहा पिणार का?" अशी विचारपूस करत आमदार पडळकर यांना आपल्या छोट्याशा पालात चहासाठी निमंत्रित केले. पावसाच्या सरींच्या साक्षीने त्या कुटुंबासोबत घेतलेला चहाचा घोट हा कोणत्याही सत्कारापेक्षा मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी जत शहराचे ज्येष्ठ भाजप नेते व नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, जागर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम भैया मोरे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक मिथुनदादा भिसे, राजू यादव, फिरोज नदाफ, गौतम ऐवळे, अतुल मोरे, प्रकाश मोटे, युवा नेते अनिल पाटील, गोपाल पाथरूट तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सेवाभावी उपक्रमातून "सेवाच हा खरा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.