जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा व आषाढी एकादशी वारीचे औचित्य साधून इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेला विठ्ठल-रुक्मिणी पालखी दिंडी सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विशेष म्हणजे, या सोहळ्यात वरुणराजानेही रिमझिम सरींची हजेरी लावत भक्तीमय वातावरणात अधिकच रंग भरला.
टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी सोहळ्याला रंगत आणली. विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीचे विधिवत पूजन व आरती प्राचार्या समता मखरे व संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे या उभयतांच्या हस्ते घेऊन दिंडीला प्रारंभ केला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावता माळी, संत जनाबाई आदी संतांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अभंग, भजन आणि फुगड्यांच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा सुंदर आविष्कार साकारला.
रिमझिम पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. दिंडीमुळे संपूर्ण शैक्षणिक संकुल परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याची गोडी, वारकरी संप्रदायाचे संस्कार, शिस्त, सामूहिकता, समता आणि भक्तीभाव रुजविण्याचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिंडी सोहळा संस्मरणीय ठरला.
भक्ती, संस्कार आणि निसर्गाचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या दिंडी सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय छाप पाडली.
या भक्तिमय सोहळ्यास इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), मुख्याध्यापक साहेबराव पवार,पालक उपस्थित होते.
सोहळ्याचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप,हिरालाल चंदनशिवे यांनी केले. तर आभार प्रा. सोमनाथ माने यांनी मानले.