तासगाव येथे प्रांत कार्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना विरोध करत जिल्हा विकास व सनियंत्रण समिती, सांगलीचे सदस्य प्रा. दादासाहेब ढेरे यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. "तासगावला प्रांत कार्यालय झाल्यास मी आमरण उपोषण करीन," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
प्रा. ढेरे म्हणाले की, अंजनी आणि चिंचणी येथील काही नेते म्हणजे संपूर्ण तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ नव्हे. केवळ मतदारसंख्या अधिक आहे म्हणून त्यांना जास्त भागीदारी मिळावी, ही भूमिका योग्य नाही. "ज्याची मतदारसंख्या भारी त्याचीच ज्यादा भागीदारी" हे धोरण लोकशाहीला मान्य होऊ शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, "बळी तो कानपिळी" हे सूत्र दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांनी कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी नेहमीच सर्व घटकांना समान न्याय देण्याची भूमिका घेतली. मात्र, तासगाव येथे प्रस्तावित प्रांत कार्यालयामुळे कवठेमहांकाळ तालुका आणि येथील नागरिकांवर सर्वांगीण अन्याय होत आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.
शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून कवठेमहांकाळ तालुक्याला न्याय द्यावा, अशी मागणी करत प्रा. ढेरे यांनी स्पष्ट केले की, जर शासनाने तासगाव येथेच प्रांत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवला, तर त्याविरोधात आपण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू.
प्रांत कार्यालयाच्या मुद्द्यावरून कवठेमहांकाळ तालुक्यातील जनभावना तीव्र होत असून, या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर विरोधाचा सूर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.