राणेंची हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही - परशूराम उपरकर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 160 Views
राणेंची हुकूमशाही आम्ही  चालू देणार नाही - परशूराम उपरकर
अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील अणुऊर्जा प्रकल्प रोखण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करेल भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी देशातील लोकशाही संपविण्याचा विडाच उचलला
देवगड-मुणगे येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा होत असलेला विरोध आणि त्यासंदर्भात खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार तथा शिवसेना नेते परशूराम उपरकर यांनी आज तीव्र टीका केली. राणेंची हुकूमशाही आम्ही इथे चालू देणार नाही. अणुऊर्जा प्रकल्पविरोधातील आंदोलनात शिवसेना सक्रियपणे सहभाग घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच सत्ताधारी भाजप आणि शिंदे शिवसेनेचे खासदार लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. कणकवली येथील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. उपरकर म्हणाले, देवगड-मुणगे येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिकांची घरे, बागायती आणि उपजीविकेची साधने बाधित होणार असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. मात्र, प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना "फटके देऊ" अशी भाषा खासदार नारायण राणे करत आहेत. लोकशाहीत अशा प्रकारची भाषा अयोग्य असून ती निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

अणुऊर्जा प्रकल्पामुळे वीज निर्मिती होऊन भविष्यात मोठे उद्योग येतील आणि रोजगार निर्माण होईल, असा दावा खासदार राणे करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ काम करताना त्यांनी सिंधुदुर्गात किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, याचे उत्तर त्यांनी द्यावे, तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प गेल्या बारा वर्षात त्यांना का सुरू करता आला नाही याचेही उत्तर त्यांनी द्यावे असे आव्हानही उपरकर यांनी दिले.

स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. या केंद्राचे भूमिपूजन ही नारायण राणे यांनी केले होते. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प उभाच राहिला नाही. त्या प्रशिक्षण केंद्राचे काय झाले, याचे उत्तर राणे यांनी प्रथम द्यावे आणि त्यानंतरच अणुऊर्जा प्रकल्पामुळे रोजगार मिळेल, अशा घोषणा कराव्यात, असा टोला त्यांनी लगावला.

श्री. उपरकर म्हणाले, यापूर्वीही सिंधुदुर्गातील विविध प्रकल्पांच्या संदर्भात खासदार राणे यांनी अशाच प्रकारची हुकूमशाहीची भाषा केली होती. मात्र, अशा वक्तव्यांना शिवसेना भीक घालणार नाही. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील आणि हा प्रकल्प रोखण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित अणऊर्जा प्रकल्पामळे सिंधुदुर्ग सह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे प्रभावित होण्याची शक्यता असल्याचा दावा करताना त्यांनी हापूस आंबा बागायती, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावरही त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली. मच्छीमारी आणि बागायतदारांची उपजीविका धोक्यात आणणारा तसेच संपूर्ण देवगड तालुक्याचे नुकसान करणारा अणुऊर्जा प्रकल्प आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शिंदे शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत गेलेल्या संजय पाटील यांनी पाच-पाच खून आणि बॉम्ब टाकण्याची भाषा केली असून भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी देशातील लोकशाही संपविण्याचा विडाच उचलल्याची टीकाही श्री. उपरकर यांनी केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |