तासगाव तालुक्यात सध्या विहिरी आणि बोरवेलवरील विद्युत केबल व पंप मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शेतकरी आर्थिक महागाईमुळे आधीच पुरता बेजार झाला असून, त्यात भरीत भर म्हणून या चोरांच्या टोळीमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. एकाच रात्रीत पाच ते सहा ठिकाणच्या केबल चोरीला जात असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटे आणि आर्थिक मंदीच्या काळात होत असलेल्या या चोरीच्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या चोरांच्या टोळीचा पोलीस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता तालुक्यातील प्रत्येक गावातून जोर धरत आहे.
जुने गुन्हे अद्यापही उघड नाहीत
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच केबल व मोटार चोरीच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. मात्र, अद्यापही बहुतांश प्रकरणांचा तपास लागलेला नाही. चोरीच्या घटनांचा कोणताही छडा न लागल्यामुळे चोरांचे फावले असून, ते अधिकच निर्ढावले आहेत. या पार्श्वभूमीवर, "आता तरी पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवून या टोळीचा छडा लावावा," अशी आर्त अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
तालुक्यातील शेतकरी महागाई आणि शेतीमालाच्या अनिश्चित भावामुळे आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच पिकांना पाणी देण्यासाठी लागणारी केबल आणि मोटार सुरक्षित ठेवणे आता जिकिरीचे झाले आहे. चोरट्यांची टोळी अत्यंत नियोजनबद्ध रितीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही चोरी करत आहे. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पाणीपुरवठा खंडित होत असल्याने पिके वाळू लागली आहेत.
पोलीस यंत्रणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का, याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर या चोरांच्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे