मिठमुंबरी सरपंच यांची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मीठमुंबरी येथील विजय शांताराम तोडणकर यांना सन २०२२-२३ मध्ये गोठा बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली होती. सदर गोठा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये गुरे ठेवणे बंधनकारक असल्याचा ठराव मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित लाभार्थ्याने १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लेखी हमीपत्रही दिले होते, असे ग्रामपंचायतीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.मात्र गोठा बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप गोठ्यात गुरे ठेवण्यात आलेली नसून सध्या त्या ठिकाणी आंबा काढणीसाठी आलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा साठा ठेवण्यात आल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.
याबाबत संबंधित लाभार्थ्याने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत मीठमुंबरी ग्रामपंचायत सरपंच यांनी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.