जत तालुक्यातील लकडेवाडी येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत वडिलांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाला जत न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी संशयित पृथ्वीराज खंडू भिसे (वय २२) याचा त्याचे वडील खंडू श्रीमंत भिसे (वय ४५) यांच्याशी काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पृथ्वीराजने वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात खंडू भिसे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले; मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीदरम्यान तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानुसार जत न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि अन्य बाबींचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो याचे विदारक उदाहरण ठरत असून, संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.