पर्यावरण संरक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे, वन विभाग प्राणी, झाडे, वन्यजीव यांचे संगोपन व संरक्षण करणार आणि तुम्ही त्यास हानी पोहचविणार असे कसे चालेल? असा प्रश्न उपस्थित करत ही सगळ्यांची जबाबदारी असल्याचे कुंडल वन प्रबोधनीचे वन संचालक एस.एस.भागवत यांनी सांगितले.
कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'जागतिक पर्यावरण दिन' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.अधिकराव जाधव, उपप्राचार्य डॉ.युवराज जाधव, डॉ.रणवीर पवार, डॉ.धैर्यशील लाड, डॉ.चारुदत्त औताडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक एस.एस. भागवत पुढे म्हणाले, पर्यावरण रक्षण ही काळजी गरज आहे, तुम्ही जर पर्यावरणाचे रक्षण करू शकत नसेल तर किमान त्यास हानी तर पोहचू देऊ नका, वायू प्रदूषणा मुळे लाखो मुले मृत्युमुखी पडत आहेत, आणि यामध्ये आपण पहिल्या स्थानावर आहे. ही गंभीर व चिंतेची बाब आहे. दिवाळीतील फटाके हे प्राणघातक असून कृपया त्यापासून सर्वांनी पुर्णतः लांब राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरीकरणाच्या नादात जंगले रिकामी झाली आणि त्यामुळे जंगली प्राणी लोकवस्तीत घुसू लागले आहेत, मग यास जबाबदार कोण?
प्राण्यांच्या अवयवासाठी त्यांची कत्तल होत आहे. यामुळे अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत. प्राणी, वनस्पती प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याचे काम करत असतात, पण दुर्दैवाने आपण त्यावरच आघात करत आहोत. मानव जातीची निर्माण झाल्यापासून पृथ्वीचे ८३ टक्के नुकसान झाले असून आपण विकास करतोय की विनाश हे तपासणे गरजेचे आहे, हे असेच सुरू राहीले तर पृथ्वी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. हक्काच्या गोष्टी करताना जबाबदारीचं भान असले पाहिजे.
प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अधिकराव जाधव म्हणाले, ऑक्सिजन ची किंमत ही हॉस्पिटलमध्ये असताना कळते निसर्गातील ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळत नाही, हे दुर्दैव आहे. गरजा कमी केल्याशिवाय प्रदूषण कमी होणार नाही. प्राणी, पक्षी हे मानवी जीवनाची गरज आहे, त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन अंतिम वर्षे प्रवेशित विद्यार्थिनी कु.अश्विनी थिटे यांनी केले, तर आभार डॉ.चारुदत्त औताडे विद्याशाखाप्रमुख यांनी मानले. याकार्यक्रमास प्रा.विजय हावळे, प्रा.विजय पाटील, प्रा.व्ही.आर.जगदाळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते