आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोकड अथवा बकरीचे मटण म्हणून ग्राहकांना मोठ्या जनावरांचे मटन विकल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी तब्बल १० लाख रुपये घेतल्याची चर्चा रंगू लागली असून, या चर्चेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या काळात संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत होती. राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या काळात नागरिकांनी नेमकं कोणतं मटण खाल्लं, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, तपास अहवाल जाहीर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, प्रकरण उघडकीस आल्यानंतरही संबंधित अधिकारी माध्यमांसमोर बोलण्यास तयार नसल्याची चर्चा असून, त्यामुळे संशय अधिकच वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या मौनामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
दरम्यान, कथित आर्थिक व्यवहार, मटणाचे नमुने, तपासणी अहवाल आणि संबंधित हॉटेलची भूमिका यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अन्नसुरक्षा, ग्राहकांचा विश्वास आणि प्रशासनाची पारदर्शकता हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.