पुणे-कोल्हापूर दरम्यान रात्री ९.४० वाजता धावणाऱ्या विशेष रेल्वेमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याची तक्रार समोर आली आहे. गोंदिया-कोल्हापूर या गाडीचे डबे पुणे-कोल्हापूर स्पेशलसाठी जोडले जात असल्याने गाडीवरील बोर्ड बदलले जात नाहीत. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या अनेक प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पुणे स्थानकावर पुणे-कोल्हापूर स्पेशल आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस यांच्या वेळेत अवघे २० मिनिटांचे अंतर असल्याने अनेक प्रवासी चुकीने कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत चढतात. पुढे सासवड रोड किंवा जेजुरी येथे चूक लक्षात आल्यानंतर ते उतरतात; मात्र तोपर्यंत महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे स्थानक सोडून गेलेली असते. त्यामुळे दररोज शेकडो प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे तिकीट तपासनीस (टीसी) देखील त्रस्त झाले असून, प्रवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींना त्यांनाही सामोरे जावे लागत आहे. संबंधित समस्येबाबत दोन महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या फेसबुक वॉलवरून उपरोधिक शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला आहे. "रेल्वे प्रशासनाकडे बोर्ड बदलण्यासाठी कर्मचारी नसतील, तर अदानी किंवा अंबानी यांना ठेका द्या; पण गाडीचे बोर्ड दररोज बदलले गेले पाहिजेत," अशी टीका करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या मते, केवळ योग्य आणि स्पष्ट बोर्ड लावल्यास हा गोंधळ सहज टाळता येऊ शकतो. आता रेल्वे प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.