"गरिबांची साथ हीच माझी ताकद; म्हणूनच दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत" – महादेव जानकर

👤 डॉ संकेत तुकाराम सानप मुंबई | 📅 28 July 2026 | 👁 1027 Views
"गरिबांची साथ हीच माझी ताकद; म्हणूनच दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत" – महादेव जानकर
पुणे | प्रतिनिधी
"माझ्याकडे पैशांची ताकद नाही, माझ्याकडे गरिबांची ताकद आहे. मंत्रीपदावर असताना मी कधीही गैरव्यवहार केला नाही. माझे राजकारण स्वच्छ आणि पारदर्शक असल्यामुळेच आज मी दिल्लीशीही ठामपणे पंगा घेण्याची हिंमत ठेवतो," असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित 'युवा जोडो संकल्प अभियान'*चा शुभारंभ पुण्यातील गांजवे चौक येथील पत्रकार भवनातून जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि युवकांशी थेट संवाद साधत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचा संकल्प मांडला.
जानकर म्हणाले, "माझ्या पाठीशी श्रीमंत लोक नाहीत, तर सामान्य आणि गरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. सत्तेत असताना मी त्यांना मोठ्या प्रमाणात काही देऊ शकलो नसतानाही ते आजही माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. जर मी भ्रष्टाचार केला असता, तर माझ्यामागे तपास यंत्रणा लागल्या असत्या. मात्र माझ्या प्रामाणिक राजकारणामुळे केंद्र किंवा राज्य सरकार माझे काहीही वाकडे करू शकत नाही."
पक्ष स्थापनेच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमी चोंडी येथे दलित, भटके-विमुक्त आणि वंचित समाजाला सोबत घेऊन रासपची चळवळ सुरू झाली. सुरुवातीला अवघ्या ४० कार्यकर्त्यांसह सुरू झालेल्या या प्रवासात आज लाखो लोक जोडले गेले आहेत. "राष्ट्रीय समाज पक्ष हा कोणत्याही सत्ताकेंद्राच्या आडोशाला निर्माण झालेला पक्ष नाही, तर स्वाभिमानाच्या भूमीत उभा राहिलेला जनतेचा पक्ष आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त करताना जानकर म्हणाले, "सत्ता येते-जाते; मात्र आमचे ध्येय हजारो युवकांना आमदार-खासदार बनविण्याचे आहे. पारधी, मसनजोगी आणि वंचित समाजातील तरुणांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून मंत्रीपदापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कटिबद्ध आहे."
युवकांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील तरुणांमध्ये परिवर्तन घडविण्याची अफाट ताकद आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतल्यास युवक देशाच्या भविष्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात. 'युवा जोडो संकल्प अभियान' राज्यभर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन करत २०२९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष राज्य आणि देशाच्या सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रल्हाद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनीताताई किरवे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |