तासगाव बायपासला बाधितांचा तीव्र विरोध; 'शहरालगतचा मार्ग रद्द करा, अन्यथा कायदेशीर लढा'
👤 संतोष एडके तासगाव |
📅
02 August 2026 |
👁 503 Views
तासगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील प्रस्तावित तासगाव बायपास शहरालगतून नेण्याच्या निर्णयाला बाधित नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरालगतून जाणाऱ्या प्रस्तावित मार्गामुळे घरे, व्यावसायिक आस्थापने, बिनशेती व नियमितीकरण केलेले प्लॉट तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे हा मार्ग तातडीने रद्द करून बायपास शहरापासून किमान तीन ते चार किलोमीटर अंतरावरून नेण्यात यावा, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा बाधित नागरिकांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ३१ जुलै) पुनदी रोड येथील हॉलमध्ये शेकडो बाधित नागरिकांची बैठक झाली. बैठकीत "शहरालगतचा बायपास नकोच" अशी एकमुखी भूमिका घेण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्याची रुंदी अधिक राहणार असून, भूसंपादनामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
शहराच्या विकासासाठी बायपास आवश्यक असल्याचे मान्य करतानाच, त्यासाठी नागरिकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त करणे योग्य नसल्याचे मत उपस्थितांनी मांडले. इतर शहरांप्रमाणे तासगावचाही बायपास शहरापासून सुरक्षित अंतरावरून नेण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
याबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून पर्यायी मार्ग निश्चित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, मागणी मान्य न झाल्यास न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गाने तीव्र लढा उभारण्याचा निर्धार बाधित नागरिकांनी व्यक्त केला.
बैठकीत उपस्थित नागरिकांनी बायपासच्या नावाखाली नागरिकांचे संसार, व्यवसाय आणि शेती उद्ध्वस्त होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे तासगाव बायपासच्या प्रश्नावर बाधित नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.