जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने "मरेपर्यंत फाशी" ही अत्यंत कठोर व ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) विशेष न्यायालयाने हा दणदणीत निकाल दिला. पुण्यातील नसरापूर प्रकरणानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आलेले हे दुसरे प्रकरण ठरले आहे.
पांडुरंग सोमना कळ्ळी (वय ४६, रा. करजगी, ता. जत) असे या क्रूरकर्मा आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१), २३८, ६५(२), १२७(२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यातील कलम ४, ५(आय), ६, ८ व १२ अंतर्गत आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
खेळता खेळता चिमुरडी नराधमाच्या तावडीत
६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या दरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली होती. अवघ्या चार वर्षे तीन महिन्यांची पीडित बालिका आपल्या आठ वर्षीय मैत्रिणीसोबत घराबाहेर खेळत होती. दोघी खेळत खेळत आरोपीच्या घरासमोरील बदामाच्या झाडाखाली बदाम गोळा करण्यासाठी गेल्या. त्याच वेळी मोठ्या मुलीला तिच्या आईने शाळेसाठी घरी बोलावल्याने ती निघून गेली. याच एकाकीपणाची संधी साधत आरोपीने चिमुरडीला आपल्या घरात नेले.
तेथे तिच्यावर अमानुष पाशवी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून प्लास्टिकमध्ये गुंडाळला आणि आपल्या घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला.
शोधमोहिमेत सहभागी होऊनही संशयाच्या भोवऱ्यात
घटनेच्या वेळी पीडित बालिकेची आई कर्नाटकातील मुधोळ येथे माहेरी गेली होती, तर वडील कामानिमित्त रत्नागिरी येथे होते. त्यामुळे चिमुरडी आजीकडे राहत होती. बालिका बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली.
विशेष म्हणजे, आरोपी पांडुरंग कळ्ळी स्वतः गावकऱ्यांसोबत शोधमोहिमेत सहभागी होऊन शोध घेण्याचे नाटक करत होता. मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पुराव्यांचा फास आवळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरातील लोखंडी पेटीतून पीडितेचा मृतदेह जप्त करण्यात आला.
१५ दिवसांत तपास पूर्ण व पोलीस पथकाची चमकदार कामगिरी
या क्रूर घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत अवघ्या १५ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदर आरोपीस फाशीची शिक्षा लागण्यासाठी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (जत) श्री. सुनील साळुंखे, तत्कालीन प्रभारी अधिकारी (उमदी पोलीस ठाणे) श्री. सचिन कांबळे, पोहेकॉ सुनील व्हनखंडे, पोहेकॉ संतोष माने, पैरवी अंमलदार पोहेकॉ वंदना मिसाल व पोलीस शिपाई शिवाजी माळी यांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीस बचावाची कोणतीही संधी दिली नाही.
सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी न्यायालयात अतिशय प्रभावी बाजू मांडली. आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास, चिमुरडीवर केलेले क्रूर अत्याचार आणि समाजमनावरील आघात न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत कमाल शिक्षेची मागणी केली. वैद्यकीय व फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून "मरेपर्यंत फाशी" ही शिक्षा सुनावली.
न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
या निकालानंतर पीडित कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली असून, सामाजिक संघटना व नागरिकांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.