आषाढात उपवासाला साबुदाणा-बटाटा टाळा
आषाढ महिन्याची सुरुवात होताच अनेक घरांमध्ये चातुर्मास, एकादशी, सोमवार, गुरुवार अशा विविध धार्मिक व्रत-वैकल्यांना प्रारंभ होतो. श्रद्धा म्हणून उपवास केला जात असला, तरी तो प्रत्येकासाठी सारखाच लाभदायी ठरेल, असे नाही. वय, प्रकृती, दैनंदिन शारीरिक श्रम, आधीपासून असलेले आजार आणि हवामान यांचा विचार न करता दिवसभर उपाशी राहणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. या काळात साबुदाणा, बटाटा, तळलेले आणि गोड पदार्थ टाळून हलका, सहज पचणारा आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिला.
सात्त्विक, हलका आहार घ्या
* राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे आणि दूध यांचा आहार लाभदायक.
* सफरचंद, केळी यांसारखी हंगामी फळे आणि फलाहार घ्या.
* शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नारळ पाणी आणि ताक प्यावे.
* उपवास सोडताना (पारण करताना) मूग डाळीच्या खिचडीसारखा सहज पचणारा आहार.
उपवास सोडताना हलका आहार घ्या
"उपवास हे केवळ धार्मिक आचरण नसून ते एक शास्त्रीय आरोग्यशास्त्र आहे. फलाहार, नारळ पाणी किंवा ताक या सात्त्विक पदार्थांचे सेवन पथ्यकारक ठरते. उपवास सोडताना जड आहार न घेता मूग डाळीच्या खिचडीसारखा हलका आहार घेणे योग्य ठरेल."
अर्जुन दबडे, आयुर्वेदाचार्य
पचनास जड आहार टाळा
उपवासाला केवळ साबुदाणा, बटाटा यांवर अवलंबून राहू नका.
भजी, वडे असे अति तळलेले आणि अतिस्निग्ध पदार्थ टाळा.
बाहेरचे किंवा अतिगोड, जड पदार्थ टाळा.
मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटात जळजळ, ॲसिडिटी होईल.
केवळ श्रद्धा नको, प्रकृतीचाही विचार करा
"आषाढ काळात पचनशक्ती कमी होते. उपवास करताना श्रद्धेसोबत स्वतःची प्रकृती, वय आणि आजार यांचा विचार करा. दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा हलका आहार घ्यावा, थोडे-थोडे कोमट पाणी प्या. राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे, दूध आणि फळे शरीराला ऊर्जा देतात. तेलकट पदार्थ टाळा."
अमित मिसाळ, आयुर्वेदाचार्य