माणदेशी मातीचा सुपुत्र हा थोर,
कलेच्या जगात ज्याचा चाललाय जोर.
अंधारमाया भेदूनि प्रकाश पाडला,
मुंबईच्या नगरीत डंका तुझा वाजला.
राष्ट्रपतींचा मान आधीच शिरपेचात,
आता E4M चा तुरा खोवला मानात.
भीमराव, तुझ्या लेखणीला आणि दिग्दर्शनाला सलाम,
विलास खरात ज्येष्ठ साहित्यिक आटपाडी
मराठी ओटीटी विश्वात आपल्या दमदार कथानकाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ‘अंधारमाया’ या गाजलेल्या वेब सिरीजने प्रतिष्ठेच्या E4M (Exchange4media) पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘अंधारमाया’ला सर्वोत्कृष्ट मराठी वेब सिरीज हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेब सिरीजचे दिग्दर्शक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि आटपाडीचे सुपुत्र भीमराव मुढे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यासह दुष्काळी माणदेशाचा गौरव उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आटपाडीचे ज्येष्ठ साहित्यिक विलास खरात यांनी माणदेशच्या या सुपुत्राचे अभिनंदन करत आपल्या भावना काव्यरूपाने व्यक्त केल्या आहेत मुंबईत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत ‘अंधारमाया’ने आपल्या दर्जेदार निर्मितीमूल्ये, प्रभावी कथा आणि खिळवून ठेवणाऱ्या दिग्दर्शनाच्या जोरावर हा बहुमान पटकावला.दिग्दर्शक भीमराव मुढे यांनी मराठी चित्रपट, मालिका आणि डिजिटल माध्यमांमध्ये आपल्या कसदार दिग्दर्शनाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘अंधारमाया’च्या यशातून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची छाप उमटवली आहे.‘अंधारमाया’ला सर्वोत्कृष्ट मराठी वेब सिरीजचा पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच आटपाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य, कला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांनी भीमराव मुढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.“भीमराव मुढे यांचे हे यश आटपाडीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आटपाडीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. त्यांच्या आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.